प्रिय मोहन बाळ,
मोठमोठ्या पांढऱ्या मिशा असूनही मी तुला बाळ
म्हटलं म्हणून रागवू नकोस, तू जन्माला आलास तेव्हा मी चाळीस वर्षांची होते.
स्पष्टच सांगते, माझा जन्म १९१० सालचा तर तुझा १९५० सालचा. मी १९४८ साली भारतात
स्थायिक झाले तेव्हा तुझा जन्मही व्हावयाचा होता. त्यामुळे मी तुला बाळ म्हणू
शकते. तुला “प्रिय” म्हणावं असं काही खास कारण नाही, उलट तू माझ्याबद्दल जे काही
बोललास, त्यामुळे अनेक लोकांमधे तू “अप्रिय” च झालास पण मला सगळे “प्रिय” च असतात.
तसा तूही प्रिय आहेस. असो.
माझ्या गोरगरीब आणि रस्त्यावर पडलेल्या रूग्णांच्या
सेवेमागचा मूळ हेतू धर्मपरिवर्तन हा होता, असं बालिश आणि तथ्यहीन विधान केल्यामुळे
तू अजूनही “बाळ” च आहेस याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. माझं कार्य १२३
देशातील ६१० ठिकाणी चालतं. यापैकी बहुसंख्य देशात ख्रिश्चनांचीच संख्या जास्त आहे
आणि त्यांना मी ख्रिश्चन बनवलेलं नाही. आणि भारतात सुद्धा मी कोणालाही, कधीही
जबरदस्तीने किंवा आमिष देवून ख्रिश्चन बनवल्याची कसलीही माहिती उपलब्ध नाही.
कोणीही माझ्याविरुद्ध त्याबाबत तक्रार केलेली नाही. मी रूग्णांचे धर्मपरिवर्तन
करण्यासाठी त्यांची सेवा करत नव्हती. कोलकात्याच्या कालीघाट येथील एका दुर्लक्षित
हिंदू मंदिरात १९५२ साली मी रुग्णसेवा सुरु केली. मरणाच्या दारात असलेले अनेक
रुग्ण, ज्यांना कोणी विचारत नव्हते असे अनेक रुग्ण उपचार घेत घेत सुखानं आणि
सन्मानानं देवाघरी गेले. रस्त्यावर, नदीकाठी, गटारात पडलेल्या आणि असंख्य यातना
भोगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणारा कोणता “धर्म” असतो रे? तुम्हाला सेवा नका करू असं
कोण म्हणतंय? सेवाभाव असलाच पाहिजे. तुम्ही आणि तुमचा धर्म एवढा सक्षम आहे, जगाला
ज्ञान वाटायला निघाला आहे, केवळ हिंदू धर्मच जगाला मार्ग दाखवू शकतो, असं तुम्ही
सांगता, जगाचं जाऊ द्या, आधी आपल्या गोरगरीब, दलित, पीडित, असहाय बांधवांकडे लक्ष
द्या, नाही तर पुन्हा एखाद्या “मदर तेरेसा” ला बाहेर देशातून भारतात येवून सेवा
करावी लागेल.
बरं, धर्मप्रसार करणं हे माझं कामच होतं, त्यात
गैरकायदेशीर काय होतं? मी काही कोणाला जबरदस्ती करीत नव्हते किंवा धर्म बदलला तरच
सेवा करीन असंही म्हणत नव्हते. कुठल्याही अटी आणि शर्ती लागू नव्हत्या. माझ्या या
सेवाभावासाठीच मला अनेक पुरस्कार मिळाले. धर्मप्रसारासाठी नव्हे, हे लक्षात घे. अमुक
इतक्या लोकांचे मी धर्मपरिवर्तन केले अशी काही आकडेवारी उपलब्ध आहे का? माझ्याइतके
पुरस्कार मिळवणारी दुसरी एखादी व्यक्ति तुला माहित असेल तर सांग. इतक्या मोठ्या
उंचीच्या (मला माझी तारीफ करायची नाहीये तरी सुद्धा......) व्यक्तिबद्दल बाष्कळ
विधान करून तू आपलं खुजेपण सिद्ध केलंस.
तुमचा एवढा मोठा आणि जुना सनातन धर्म असताना
कोणी अनाथ राहूच कसा शकतो? शोषित, पीडित, राहूच कसे शकतात? या लोकांना नाना
प्रकारच्या यातना होत असताना कुठे जातो तुमचा धर्म? बरं धर्म जाऊ द्या, संघ कुठे
जातो तुमचा? मी भारतात येण्यापूर्वीपासून संघ अस्तित्वात आहे न? असे असताना
माझ्यासारख्या परदेशी परधर्मीय व्यक्तीची गरज का पडावी? असं नसतं बोलणं आणि करणं
यात खूप फरक असतो. “ मदर टेरेसा जैसा यहा नही चलेगा” असं भाषणात म्हणून नसतं होत.
मी जगभर सेवाकार्य केलं तुम्ही भारतात तरी नीट करून दाखवा. माझा तुम्हाला आशीर्वाद
आहे, शुभेच्छा आहेत. इतक्या दशकांनंतर तुम्हाला “एक विहीर, एक देऊळ, एक स्मशान”
असल्या कल्पना सुचत आहेत. देर आये दुरुस्त आये. पण या आधी का नाही सुचल्या? असो.
मला माझं महात्म्य सांगायचं नाहीये, पण माझ्यावर
नको ते आरोप करण्यापूर्वी तू जरा विकिपीडिया वाचून घ्यायला हवं होतंस. त्यात
माझ्याबद्दल जितकं लिहिलंय त्याच्या १/१० ही तुझ्याबद्दल लिहिलेलं नाहीये. पण
मुद्दा तो नाहीये. तू अजूनही खूप काही करू शकतोस. गोरगरिबांचं कल्याण कर,
किमानपक्षी तुझ्या महान धर्मातल्या जातीपाती, उच्चनीच भाव नष्ट कर, सेवेअभावी एकही
रुग्ण रस्त्यावर तळमळत प्राण सोडणार नाही याची काळजी घे, अस्मिता जागवण्यापेक्षा
सेवाभाव जागव, बेरोजगार तरुणांना सत्कार्यास प्रवृत्त कर, राजकारणात ढवळाढवळ
करण्यापेक्षा समाजकारण कर. मला माहित आहे संघातर्फे खूप सेवाकार्ये चालतात. पण
दुसऱ्याला लहान दाखवून किंवा त्यावर टीका करून स्वत: मोठं होता येत नाही हे लक्षात
ठेव. तुझ्या कार्याचा परीघ वाढव, आपली रेष मोठी कर आणि कृपा करून कोणाहीबद्दल
गैरसमज पसरवू नको. “इंडियात बलात्कार होतात भारतात नाही” असं बेधडक फेकणाऱ्या
व्यक्तीकडून काय अपेक्षा करावी? असो. अजूनही वेळ गेलेली नाही. कामाला लाग. अनाथांचा
नाथ हो. ईश्वर (आमचा असो की तुमचा) तुला सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझी आणि सर्वांचीच
मदर टेरेसा
अॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००.