विश्वासघाताची किंमत
एका व्यक्तीने
दुसऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केल्यावर आरोपीविरुद्ध खटला उभा व्हायला कशी २०
वर्षे लागली हे सांगणारी कहाणी.......
राजस्थानच्या सवाई
माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सिटी शहरात राहणाऱ्या रामदयालने त्याच्या तीन
सोनसाखळ्या (६.५ तोळे वजनाच्या) घनश्याम सोनाराकडे त्या वितळवून एक नवीन डिझाईनची
सोनसाखळी बनवण्यासाठी दिल्या. तब्बल वीस वर्षे जुनी घटना आहे. दि.१.१०.१९९४ रोजी
रामदयालने घनश्यामला या साखळ्या दिल्या. रामदयालच्या म्हणण्याप्रमाणे बरेच दिवस
उलटूनही घनश्यामने त्या साखळ्याही परत केल्या नाहीत आणि ठरल्याप्रमाणे नवीन
सोनसाखळी ही बनवून दिली नाही.
दि.२.११.१९९४ ला
रामदयालने घनश्यामला एक तार पाठवली आणि त्याच्या तिन्ही सोनसाखळ्या परत करण्याची
मागणी केली. दि.६.०५.१९९५ ला रामदयालने त्याच्या वकिलामार्फत घनश्यामला कायदेशीर
नोटीस पाठवून पुन्हा सोनसाखळ्या मागितल्या. परंतु घनश्यामने सर्व आरोप फेटाळले.
शेवटी रामदयालने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अन्वये गंगापूर सिटी
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६
कलमाखाली तक्रार दाखल केली. न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१
अन्यवे काही साक्षीदारांची बयाणे नोंदवण्यात आली. रामदयालने फौजदारी प्रक्रिया
संहितेच्या कलम १९० अन्वये अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात एक अर्ज
दाखल करून घनश्यामने केलेल्या गुन्ह्याची बाब निदर्शनास आणून दिली. गंगापूर
सिटीच्या पोलीस निरीक्षकांनी प्रकरणाचा तपास करून रामदयालचा एफ.आय.आर. खोटा
असल्याचा आणि त्याच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला.
रामदयालने त्या अहवालावर आक्षेप नोंदवणारा अर्ज दाखल केला. परंतु अतिरिक्त मुख्य
न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसाचा अहवाल ग्राह्य धरून रामदयालचा अर्ज फेटाळला.
रामदयालने अति.
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या
न्यायालयात आव्हान दिले. अति. सत्र न्यायाधीशांनी रामदयालचे आव्हान योग्य ठरवीत
प्रकरण अति. महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रकरणाची परत सुनावणी करण्यासाठी
परत पाठवले. अति. महानगर दंडाधिकारी यांनी पुन्हा सुनावणी केली, सर्व कागदपत्र
तपासले आणि प्रकरणात काहीही तथ्य नसल्याच्या निष्कर्षावर येत रामदयालची तक्रार
फेटाळली. या निर्णयाला रामदयालने अति. सत्र न्यायाधीशाकडे रिव्हिजन दाखल करून
आव्हान दिले. परंतु त्यांनीही अति. महानगर दंडाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला.
त्यानंतर रामदयालने
राजस्थान उच्च न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अन्यवे याचिका
दाखल करून खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. दि. ४.०२.२००९ रोजी उच्च
न्यायालयाने रामदयालची याचिका मंजूर केली आणि खालच्या न्यायालयाचे निष्कर्ष चुकीचे
होते असे ठरवीत आणि साक्षीदारांच्या बयाणांवरून आरोपी घनश्यामने सोनसाखळ्या
घेतल्या पण परत दिल्या नाहीत सबब त्याने प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत
असल्यामुळे प्रकरण अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात परत पाठवले.
उच्च न्यायालयाच्या
या आदेशाला घनश्यामने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले.
सर्वोच्च न्यायालयाने घनश्यामची याचिका स्वीकारली आणि उच्च न्यायालयाचे आदेशाला
दि. ३०.१०.२००९ रोजी आदेश देवून स्थगिती दिली. त्यानंतर न्या. एस.जे.
मुखोपाध्याय आणि न्या. व्ही. गोपाल गौडा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होवून
दि.१२.१२.२०१३ रोजी अंतिम आदेश दिल्या गेला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च
न्यायालयाचा आदेश कायम ठेवत प्रकरण पुन्हा खालच्या न्यायालयाकडे सुनावणीसाठी
पाठवले. उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारावर एक नव्हे तर दोन न्यायालयांनी
रामदयालची तक्रार फेटाळली असताना उच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा खालच्या
न्यायालयात सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय योग्य होता का? हा सर्वोच्च
न्यायालयासमोर प्रश्न होता.
सर्वोच्च
न्यायालयाने उपलब्ध साक्षीपुरावे, फौजदारी स्वरूपाच्या विश्वासघाताची अनेक प्रकरणे
आणि त्यावर निरनिराळ्या उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही
निर्णय यांची चर्चा करून उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य होता आणि समोर
साक्षीपुरावे असताना रामदयालची तक्रार फेटाळण्याचा खालच्या न्यायालयांचे निर्णय
अयोग्य आणि चुकीचे होते असा अंतिम निर्णय दिला. एखाद्याने दुसऱ्याला विश्वासाने
ठेवण्यासाठी दिलेल्या वस्तूचा गैरवापर करून किंवा ती त्याला परत न करणाऱ्या
व्यक्तीने फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात (criminal breach of trust) केला असे
भा.दं.वि.च्या कलम ४०५ अन्वये समजले जाते त्यासाठी कलम ४०६ ते ४०९ नुसार
निरनिराळ्या सजाही सुचवलेल्या आहेत. या प्रकरणातील घनश्यामने केलेला प्रकार
प्रथमदर्शनी तरी फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात दिसत असल्यामुळे त्यांचेविरुद्ध
खटला चालवणे योग्य होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आता घनश्यामविरुद्ध
वीस वर्षांनी का होईना खटला सुरू होईल. पुन्हा साक्षीपुरावे होतील, युक्तिवाद
होतील, निकाल दिल्या जाईल, अपील होतील, निरनिराळे अर्ज, त्यावर आदेश, त्यावर अपील,
रिव्हिजन असे प्रकार होतील आणि शेवटी.................”न्याय” मिळेल.
यासाठी पुन्हा किती वर्षे लागतील ते “काळच” सांगेल.
एकूण काय आपल्या
व्यवस्थेतील त्रुटी म्हणा, न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाई म्हणा, रामदयालला
विश्वासघाताची चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे असे दिसते. १९९४ साली एक तोळा
सोन्याचा भाव ४५०० रुपये होता आणि आज जवळपास ३०००० रुपये आहे. या हिशेबाने तो पुढे
वाढतच जाणार हे नक्की, सगळी महागाई वाढल्यामुळे दोघांच्याही न्यायालयीन लढाईचा
खर्चही निश्चितच वाढणार. असो. फौजदारी खटला चालावा की नाही हे ठरवायला वीस वर्षे
लागत असतील तर प्रत्यक्ष खटला किती वेळ खाईल? तक्रारकर्ता आणि आरोपी या दोघांनीही
हे प्रकरण चांगलेच लावून धरल्यामुळे असा प्रकार झाला. कित्येक प्रकरणात
तक्रारकर्ता किंवा आरोपी खालच्या न्यायालयातच दम तोडतात म्हणजे दिल्या गेलेला आदेश
शिरोधार्य मानून पुढे जात नाहीत. अशा प्रकरणामध्ये खरेच “न्याय” होत असेल काय? आणि
जे मिळते त्याला “न्याय” म्हणावे काय? यातून काही मार्ग सुचतो काय?
अॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी: ९८६०१११३००