“आप” ची गरज आपल्यालाच
घाण, घाण, घाण, घाणच
आहे चोहीकडे आपणच केलेली. घाणीतच रहायचं
का नेहमीसाठी? सगळं बिघडलं आहे म्हणायचं आणि त्यातच खितपत पडायचं, काहीही न करता,
करून न बघता......... फक्त नेत्यांच्या किंवा इतरांच्या नावानं बोटं मोडायची.
गांधी असे, नेहरू तसे, यांच्यामुळे फाळणी झाली, त्यांच्यामुळे दंगे झाले, हा
धर्मांध, तो नाकर्ता, हा नपुंसक, तो भ्रष्ट, हा चमचा, तो लुटेरा, हा स्वार्थी, तो
चोर, हा बिनभरवशाचा, तो पाठीत खंजीर खुपसणारा..........अशा गप्पा घरबसल्या
मारायच्या आणि हातावर हात धरून बसायचं. कृतीशून्य, निर्विकार, थिजलेल्या
रक्तानं.....सगळे साले नालायक, सगळे साले चोर, पण आपण काय करू शकतो. काहीच नाही.
आपल्याला काय करायचंय?
आता आतापर्यंत हे
असलं चालू होतं. दोन वर्षांपूर्वी अचानक दिल्लीत अण्णा हजारेंच्या नेतृत्वात
जनलोकपालसाठी मोठं आंदोलन झालं, देश खडबडून जागा झाल्याचं चित्र निर्माण झालं
म्हणा किंवा माध्यमांनी उभं केलं म्हणा. आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या
नेत्या-कार्यकर्त्या-आयोजकांत फाटाफूट झाली, प्रत्येक जण वेगवेगळे सूर आळवू लागला.
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा कधी एक, कधी दुसरे तर
कधी तिसरेच म्हणू लागले, त्यांच्या जवळच्या सुरेश पाठारेला त्यांना बाहेरचा रस्ता
दाखवावा लागला. किरण बेदी वेगळेच तुणतुणे वाजवू लागल्या, संतोष हेगडे बाजूला झाले.
स्वामी अग्निवेश यांच्याबद्दल बवाल झाला, एकूण आंदोलनाचा पार बोजवारा उडाल्याचं चित्र
निर्माण झालं. प्रस्थापितांना तेच हवं होतं. आता कॉंग्रेसची धूळधाण होणार आणि भाजप
आपल्या मित्र पक्षांची मदत घेवून सत्तेवर येणार, अशी वातावरण निर्मिती करण्यात
आली. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. देशभर मोदी लाट
निर्माण झाल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं. भाजप, संघ, हिंदुत्ववादी संघटना आणि
त्यांचे समर्थक, झालं आता बस मोदींचा शपथविधीच तेवढा बाकी राहिलाय अशा आवेशात आणि
आवेगात वावरू लागले. इकडे बाकीचे सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले, आयाराम
गयाराम सुरू झालं. अशातच, दिल्लीसह चार राज्यांच्या निवडणुका लागल्या आणि परत
वातावरण तापले. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान ला भाजप निवडून आला आणि दिल्लीत
मात्र बहुमत मिळवू शकला नाही. तिथे केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने तब्बल २८ जागा
मिळवत भाजपची घोडदौड रोखली. भाजपचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न भंगलं. केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचं घोषित करताच,
तशी तयारी सुरू करताच प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. भ्रष्ट,
बलात्कारी, गुंड, चोर, अपहरणकर्ते, संस्थानिक, मालगुजार, राजेमहाराजे, वजनदार
आसामी, उद्योगपती यांच्या व्यतिरिक्त ही लोक निवडून येवू शकतात हे आम आदमी पक्षाने
दाखवून दिलं. आम आदमी निवडून येवू शकतो, आमदार होवू शकतो हे केजरीवालांनी दाखवून
दिलं.
वर्षानुवर्षाचा तोच
तो पणा जावून काही नवीन घडणार अशी चिन्हं दिसू लागली. टोपीचं महत्व वाढलं, मी कसा
साधा, मी कसा सरळ हे दाखवण्यात नेत्यांमध्ये अहमहमिका लागली. शीला
दीक्षितांसारख्या मातब्बर मुख्यमंत्र्याला केजरीवालांसारखा नवखा राजकारणी धूळ चारू
शकतो हे समजल्याबरोबर प्रस्थापित मंडळींची झोप मोडली. बेभान सुटलेला नमो घोडा जरा
शांत झाला. रणनीतीची फेरआखणी सुरू झाली. कॉंग्रेसचेच नव्हे तर सर्वपक्षीय नेते
भाजपात आणल्या जावू लागले. कॉंग्रेसमुक्त भारत करता करता भाजपाचीच कॉंग्रेस होते
की काय असं वाटू लागलं. भ्रष्टाचाराचा खात्मा करायला निघालेले नमो येदियुरप्पा
यांना पक्षात घेवून मोकळे झाले, एकमेकांवर आगपाखड करणारे नेते मांडीला मांडी लावून
बसू लागले आणि सगळे एकच आहेत, सगळे सारखेच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. खोटारडेपणाचा
कळस कोण गाठेल यात स्पर्धा सुरू झाली. फेकू, युवराज, शहजादे, नपुंसक, असे अनेक
शब्द एकेमेकांवर आदळू लागले. आम्ही हे केलं आम्ही ते केलं, यांनी पैसे खाल्ले,
आम्ही भ्रष्टांना बाहेर काढलं, त्यांनी भ्रष्टांना आसरा दिला, त्यांनी घोटाळे
केले, यांनी देशाचं वाटोळं केलं, असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या पार्श्वभूमीवर
आता आपण अनेक राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत आम आदमी पक्षाची गरज काय हे तपासू.
गेली सात दशकं आपण
जुनेनवे पक्ष बघतो आहोत, धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरून हवी तेव्हा उतरवून देशाच्या
व्यापक हितासाठी आपल्या सिद्धांतांना (?) मुरड घालणारे आणि पैसे
खाण्याच्या/सत्तेचा येनकेनप्रकारेण उपभोग घेण्याच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम च्या
आधारावर निरनिराळ्या खुर्च्या बळकावणारे नेते आणि त्यांचे पक्ष आपण पाहिले. चारित्र्यसंपन्न
समाज निर्माणाचं कार्य करणाऱ्या संघाचे स्वयंसेवक कसे नापास होत गेले आणि होत आहेत
हेही आपण बघितले आणि आता आपल्याला आम आदमी पक्ष बघायचा आहे. जनलोकपालाच्या
मुद्द्यावर राईटली ऑर रॉंगली केजरीवाल दिल्लीची सत्ता सोडून मोकळे झाले. केजरीवाल
पारंपारिक राजकारणी असते तर खुर्चीला चिटकून राहिले असते, जोडतोड, तडजोड केली
असती. भाजपने राम मंदिर, ३७० कलम आणि समान
नागरी कायदा, हे मुद्दे जसे बासनात गुंडाळले तसंच
केजरीवाल जनलोकपाल बासनात गुंडाळू शकत होते. पण त्यांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडतानाही त्यांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं. चारित्र्यवान,
सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासू आणि माहिती अधिकाराच्या क्षेत्रात काम करणारे
कार्यकर्ते, उच्चविद्याविभूषित अभियंते, डॉक्टर, वकील, निष्णात पत्रकार,
प्राध्यापक, निवृत्त सनदी अधिकारी (जे कधीही एरवी राजकारणात पाऊल टाकायला धजावले
नसते) अशी समाजाभिमुख माणसं लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवली. जयपराजय हा
नंतरचा विषय झाला पण त्यांना आणलं ना मैदानात. आता अशा चांगल्या चारित्र्यसंपन्न
लोकांना निवडून द्यायला काय हरकत आहे. ज्यांनी देशाची वाट लावली असं आपण म्हणतो त्यांची
वाट लावायला काय हरकत आहे. जातपात, धर्म, पंथ, पक्ष, पैसा, खोटी आश्वासनं याकडे
पाहून आपण आजवर मतदान करीत आलो, एकदा फक्त एकदाच वेगळा प्रयोग करून बघायला काय
हरकत आहे? आपलं काहीही नुकसान होणार नाही झाला तर फायदाच होईल. “आप” ला जितकी आपली
गरज आहे त्यापेक्षा जास्त “आप” ची गरज आपल्याला आहे. प्रयोग करून बघा एकदा.
अतुल सोनक
9860111300