Wednesday, February 9, 2022

अण्णा आणि वाईन

 

अण्णा आणि वाईन

“कोण आहे रे तिकडे?”, डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर वळत अण्णा म्हणाले. अण्णा ते वाईनवालं आलंय वाईन विकायला दारावर......सतरा प्रकारच्या वाईन आहेत म्हणे.”, जवळच उभा असलेला जानबा बोलला.

“अरे पण ते वाईन तर किराणा दुकानात आणि मॉलमध्ये विकणार होते न?”. “अण्णा लगबगीत उठत म्हणाले. “मला काही कळत नाही बुवा, पण काल पारावार लोक बोलत होते की अण्णा उपोषण करणार असं कळल्याबरोब्बर शासनाने ताबडतोब नवा जी. आर. काढला. दारावर वाईन विक्रीला परवानगी दिली म्हणे. इति जानबा. अरे काय मूर्ख लोक आहेत. माझा किराणा दुकानात आणि मॉल मध्ये वाईन विक्रीला विरोध आहे म्हणून मी उपोषण करणार आहे असं जाहीर केलं ना. आणि यांनी सरळ दारावर वाईन विक्रीला परवानगी देऊन टाकावी? राम कृष्ण हरी......” अण्णा (त्यांच्या) डोक्याला हात लावत म्हणाले.

“अहो अण्णा, सरकारला वाटलं असेल की अण्णांना दुकानात जाऊन वाईन घ्यायला त्रास होत असेल म्हणून ते उपोषण करणार असतील. केंद्र सरकारने जसे शेतकरी कायदे मागे घेतले तसा राज्य सरकारने वाईनबाबतचा निर्णय लोकहितार्थ (तुमच्या सारख्यांचा विचार करून) बदलला असेल अशी दाट शक्यता या ठिकाणी मला वाटते.” जानबाने आपलं मत मांडलं.

अरे पण मी वाईन घेतो का?”, अण्णा रागारागात विचारते झाले.

“नाही अण्णा, तसं नाही हो...... तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक (म्हणजे तुम्ही नाही)..... ज्यांना दुकानात जाऊन वाईन घ्यायला त्रास होतो त्यांना घरपोच दिली तर काय हरकत आहे असा सरकारचा विचार असावा. लॉकडाऊनच्या काळात नाही का केवढी सोय केली होती सरकारनं. बरं ते जाऊ द्या अण्णा.......गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारचे अनेक निर्णय असे आले की ज्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करू शकला असता, उपोषण करू शकला असता. पण तुम्ही इतकी वर्षे शांत बसलात आणि वाईन च्या निर्णयाविरोधात उपोषण....असं का?”, आता जानबा पत्रकार झाल्यागत बोलू लागला होता.

अण्णा खूप खोलवर विचार करत असल्याचा देखावा करीत बोलू लागले, “ अरे मी देशभरातला भ्रष्टाचार संपवला. शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवले. शेतकरी आत्महत्या संपल्या. देशातला काळा पैसा नष्ट झाला. सर्व सरकारी कर्मचारी कायद्यानुसार वागू लागले. सगळं सगळं नीट सुरू असताना अचानक हे वाईन प्रकरण निघालं आणि माझ्यातला आंदोलक-उपोषणार्थी जागा झाला.”

एवढं सगळं ऐकल्यावरही चूप राहील तो जानबा कसला? तो म्हणाला, “पण अण्णा हा वाईन विषय तुमच्या लेव्हलचा नाही. तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयाला हात घाला.”

“अरे जानबा....हा विषय मोठ्ठाच आहे. दारूचे दुष्परिणाम माहीत नाहीत का तुला?, इति अण्णा.

“अहो अण्णा, किराणा दुकानात गेल्यावर वाईन घेणे कंपल्सरी आहे का? दुकानात ज्या ज्या वस्तू असतात त्या आपण घेतोच का? वाईन घेणारेच विकत घेतील ना.......तुम्ही मला किराणा आणायला पाठवलं तर मी वाईन घेऊन येईन का? सांगा सांगा. डॉक्टर अभय बंग किराणा दुकानात गेले तर ते वाईन घेतील का? जे घेतच नाहीत त्यांनी का घाबरावं? तसेही वाईन खूप कमी लोक पितात असं म्हणतात. उगीचच तुम्ही स्वत:च्या जीवाला त्रास करून घेताय.” जानबाही जिद्दीला पेटला होता. या चर्चेचा काही तार्किक शेवट होताना दिसत नव्हता. अण्णांना तेवढ्यात डुलकी लागली.

उपोषण मंडपात भरपूर गर्दी होती. किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विक्रीला न ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय नुकताच जाहीर केला होता. मधला मार्ग म्हणून त्या ऐवजी वाईन दुकानाचे वेगळे परवाने द्यायचे सरकारने ठरवले होते. आंदोलकांना परवाने वाटपात प्राधान्य द्यायचे की नाही, एका गावात किती परवाने द्यायचे, दोन दुकानांमध्ये अंतर किती असावे, वाईन विक्रीचा जास्तीत जास्त लाभ शेतकर्‍यांना कसा करून देता येईल, वाईन दारू नसल्यामुळे किंवा अल्कोहोलचे प्रमाण कमी असल्यामुळे ड्रंकन ड्राइव्ह बाबत नियम शिथिल करता येईल का, वाईन विकत घ्यायला परवान्याची आवश्यकता लागेल का, घरोघरी वाईन निर्मितीची परवानगी देता येईल का, इत्यादि प्रश्नांवर एक सार्वकालिक धोरण ठरवण्यासाठी या विषयतील तज्ज्ञ “बोबडे-बंग-गडकरी” समितीची स्थापना करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले होते. तसेच राळेगणसिद्धीत एक मोठी सरकारी वाईनरी सुरू करण्याचेही ठरले. तिथल्या वाईनला “अण्णा वाईन” हे नाव देता येईल किंवा कसे यावरही समितीने विचार करावा असेही ठरले.  अण्णांच्या उपोषणाची सांगता सरकारतर्फे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्याचे ठरले. भीष्म पितामह पवार साहेब यांच्या हस्ते अण्णा वाईन-सॉरी-लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडतील असे ठरले. दरम्यान वाईन ला मराठीत पर्यायी शब्द सुचवा अशी मागणी राज ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडे केल्याचेही वृत्त आहे.

अण्णांना जाग आली. नुकत्याच पडलेल्या स्वप्नाची नशा त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. जानबा शेजारीच उभा होता. “आज कुठला ब्रॅंड आणलाय जानबा? म्हणजे भाजी कुठली आहे आज, जानबा?” असा प्रश्न विचारीत उत्तराची वाट न बघता अण्णा ईवनिंग वॉकला निघाले.

 

अतुल सोनक

९८६०१११३००