Saturday, July 26, 2014

अगा मी मेलोचि नाही........

अगा मी मेलोचि नाही........

भोवल सन्यासी उर्फ कुंवर रामेंद्र

{त.भा.चे एक जागरूक वाचक डॉ. कावळे यांनी “असे खटले असे निकाल” या स्तंभासाठी हा भोवल सन्यासी चा खटला सुचवला. खटला इंग्रज राजवटीतील असूनही आंतरजालावर सापडला. त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश असणारा असा वैशिष्ट्यपूर्ण आणि नाट्यमय खटला सुचवल्याबद्दल डॉ. कावळे यांचे आभार......}

कुंवर रामेंद्र नारायण रॉय याने ढाक्याच्या एका न्यायालयात दि. २४.०७.१९३० रोजी एक दिवाणी दावा दाखल केला. त्यात त्याने मागणी केली की तो भोवलच्या राजा राजेंद्र नारायण रॉय यांचा द्वितीय पुत्र असल्याची घोषणा व्हावी आणि राजाच्या दाव्यात नमूद केलेल्या मालमत्तेमध्ये त्याचा १/३ हिस्सा असल्याची घोषणा व्हावी तसेच ती मालमत्ता त्याच्या ताब्यात देण्यात यावी. विशेष बाब म्हणजे हा दावा त्याने त्याच्या पत्नीवरच टाकला होता. कुंवर रामेंद्र याच्या पत्नीने दावा टाकणारा माणूस तिचा पती नसल्याचा, तिचा पती पूर्वीच मेला असल्याचा आणि दावा योग्य त्या कायदेशीर मुदतीत दाखल केल्या गेला नसल्याचा प्रतिवाद केला. दावा आणि त्यावरील उत्तरावरून संबंधित न्यायालयाने निर्णय देण्याचे दृष्टीने काही मुद्दे काढले. त्यापैकी महत्त्वाचे मुद्दे असे.....१) द्वितीय कुंवर रामेंद्र नारायण रॉय जिवंत आहे काय?, २)वादी हाच कुंवर रामेंद्र नारायण रॉय आहे काय?, ३) दावा मुदतबाह्य आहे काय?

रामेंद्र यांच्या खटल्याचे कामकाज एकूण ६०८ दिवस चालले. आणि प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी दि.२४.०८.१९३६ रोजी रामेंद्रच्या बाजूने निकाल देत वादी हा कुंवर रामेंद्र असल्याची घोषणा (declaration) केली आणि सध्या बिभाबती देवी उपभोग घेत असलेल्या १/३ अविभक्त हिश्श्याचा ताबाही रामेंद्र यांना देण्यात यावा असे निर्देश दिले. या आदेशावर बिभाबती देवी यांनी त्यावेळच्या बंगाल (फोर्ट विलियम) उच्च न्यायालयात अपील केली. ती अपील २५.११.१९४० रोजी फेटाळण्यात आली. न्या. कॉसेलो, न्या.बिस्वास आणि न्या.लॉज यांच्या त्रिसदस्यीय विशेष खंडपीठासमोर या अपिलाची सुनावणी झाली आणि न्या. कॉसेलो, न्या.बिस्वास यांनी सदर अपील फेटाळली, न्या.लॉज या निर्णयाशी सहमत नव्हते परंतु बहुमताने अपील फेटाळल्या गेली.

याही निर्णयाने समाधान न झाल्यामुळे बिभाबती देवीने (Privy Council) प्रायव्ही काउंसिलकडे (त्यावेळचे सर्वोच्च न्यायालय) विशेष अनुमती याचिकेद्वारे अपील दाखल केली. Lord Thankerton, Lord PU Parcq आणि Sir Madhavan Nair यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होवून बिभाबती देवींची अपील दि. ३०.७.१९४६ रोजी फेटाळण्यात आली आणि उच्च न्यायालयाचा तसेच जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. १९३० साली दाखल झालेले प्रकरण १९४६ साली अंतिमत: निकाली निघाले. त्याकाळीही न्यायालयीन विलंब होताच हे यावरून लक्षात येईल. असो. बिभाबती देवींचे वकील श्री. पागे यांनी केलेल्या युक्तिवादाचे आणि मेहनतीचे प्रायव्ही काउंसिलने खूप कौतुक केले.  आता आपण या प्रकरणात नक्की काय आणि कसे घडले होते ते बघू.......

भोवल....तत्कालीन पूर्व बंगालातील (आताचा बांगलादेश) एक गाव/प्रदेश. राजा राजेंद्र नारायण रॉय भरपूर जमीन जायदाद असणारे तिथले मोठे जमीनदार.ढाक्याचे एक प्रमुख हिंदू जमीनदार म्हणून ख्यातिप्राप्त. यांना तीन मुले आणि तीन मुली. मुले राणेंद्र, रामेंद्र आणि रविंद्र तर मुली इंदूमयी, ज्योतिर्मयी आणि तरिन्मयी. राणी बिलासमणी ही राजाची राणी. दि.२६.०४.१९०१ रोजी राजा राजेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची राणी मालमत्तेची विश्वस्त म्हणून कारभार पाहू लागली. राणीचे निधन १९०७ साली झाले आणि राजाची तिन्ही मुले त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची सहमालक झालीत. राणेंद्र १९१० साली आणि रविंद्र १९१३ साली मरण पावलेत. हे सर्व अविभक्त कुटुंब जयदेवपूर या गावी राहत असे.
 दि.२०.४.१९०९ रोजी कुंवर रामेंद्र, त्याची पत्नी बिभाबती आणि इतर काही लोक जयदेवपूरहून दार्जीलिंगला आले. दार्जीलिंग येथील “स्टेप असाईड” नावाच्या एका बंगल्यात (भाड्याने घेतलेल्या) ते वास्तव्यास होते. त्यावेळी  कुंवर रामेंद्रच्या दोन्ही हातांना आणि पायांना फोड झाले होते. त्याला सिफलीस (gummatous ulcers on or about both elbows and on his legs being the tertiary stage of syphilis) हा रोग झाला होता. दि.८.०५.१९०९ रोजी मध्यरात्री च्या सुमारास कुंवर यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंवरची प्रेतयात्रा निघाली आणि तिथल्या नव्या स्मशानभूमीत त्याचे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. कुंवर रामेंद्र ला मृत घोषित करण्यात आले आणि त्याची अंत्ययात्रा निघाली हे कुंवरला मान्य होते. पण त्याच्या कथनानुसार त्याला ८ तारखेला संध्याकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारासच मृत घोषित करण्यात आले होते, लगेचच अंत्ययात्रेची तयारी करण्यात आणि त्याची अंत्ययात्रा जुन्या स्मशानात पोहचल्यावर खूप जोराचे वादळ आले, पाऊस आला. हा प्रकार कुंवर चा मृतदेह चितेवर ठेवताच घडला. वादळ आणि पाऊस इतके जोराचे होते की अंत्ययात्रेत सामील असलेल्या सर्वांना कुंवर चा मृतदेह चितेवरच ठेवून जवळपास आश्रय घ्यावा लागला. वादळ आणि पाऊस थांबल्यावर सगळे लोक चितेजवळ आले तर तिथे कुंवर चा मृतदेह नव्हताच. सगळे “स्टेप असाईड” ला परत गेले. दुसऱ्या एका मृतदेहाची व्यवस्था केली आणि सकाळी पुन्हा अंत्ययात्रा काढून नव्या स्मशानात जावून अंतिम संस्कार केले. त्यानंतर १० मे रोजी कुंवर रामेंद्रची पत्नी बिभाबती सर्वांसह जयदेवपूरला निघाली. काही दिवसांनंतर एप्रिल १९११ चे सुमारास ती आपल्या आई आणि भावासोबत कलकत्ता येथे भाड्याच्या घरात राहू लागली. तिने रामेंद्रच्या विमा पॉलिसीचे ३०००० रुपये ही मिळवले, त्याच्या भोवल इस्टेट मधील १/३ हिश्श्याचाही उपभोग ती घेवू लागली. ती कलकत्त्याला गेल्यावर “कोर्ट ऑफ वार्डस” ने इस्टेटीचा ताबा घेतला. तो सोडवण्याचे तिचे प्रयत्न फोल गेले.

कुंवर रामेंद्रच्या कथनानुसार तो चितेवर पडलेला असताना चार संन्याशांनी त्याला जिवंत असलेले पाहिले त्यांनी त्याला सोडवले आणि ते त्याला त्यांच्यासोबत घेवून गेले. तो त्यावेळी बेशुद्धावस्थेत होता. संन्याशांनी त्याची योग्य ती काळजी घेतली आणि काही दिवसांनी तो बरा झाला. पण त्याची स्मृती गेली होती. त्याला तो कोण आहे?, कुठला आहे? हे काहीच आठवत नव्हते. त्यामुळे तो संन्यासी जीवन जगू लागला. सर्वांगाला भस्म लावायचा, लांब केस वाढवले, दाढी वाढवली. साधारणपणे ११ वर्षांनंतर त्याला तो ढाक्याचा असल्याचे आठवले. पण तो कोण आणि काय होता हे आठवत नव्हते. डिसेंबर १९२० किंवा जानेवारी १९२१ चे सुमारास तो ढाक्याला आला आणि बुरीगंगा नदीच्या किनारी बस्तान मांडले. दिवसरात्र तो तिथेच बसलेला असायचा. त्याचेसमोर एक धुनी पेटलेली असायची. तिथे ढाक्यातील लोक फिरायला यायचे. त्यांना हा संन्यासी कुंवर रामेंद्र असल्याचा संशय येवू लागला, काही लोकांनी त्याला ओळखलेच. त्याची बहिण ज्योतिर्मयी आणि इतर नातेवाईकांनीही त्याला ओळखले त्याच्या अंगावरचे भस्म काढण्यात आले. दि.४.०५.१९२१ रोजी नातेवाईक, मित्रमंडळी आणि अनेक नागरिकांच्या उपस्थितीत तो कुंवर रामेंद्र असल्याची घोषणा करण्यात आली. ज्योतिर्मयी हि सदर दाव्यातील महत्त्वाची साक्षीदार देखिल होती.
या प्रकरणात प्राचार्य मैत्र आणि त्यांचे तीन मित्र हे ही खूप महत्त्वाचे साक्षीदार ठरले. कुंवर आणि त्याचा परिवार दार्जीलिंग ला जिथे वास्तव्यास होते तिथून जवळच एका ठिकाणी (लेविस जुबिली हॉल) दि.८.०५.१९०९ रोजी रात्रीच्या जेवणापूर्वी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ८ वाजताचे सुमारास एक इसम आला आणि म्हणाला की भोवल चा कुंवर जवळच मरण पावला आहे आणि त्याला स्मशानात अंतिम संस्कार करण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. इकडे कुंवरच्या पत्नीचे असे कथन होते की तो मध्यरात्रीच्या सुमारास वारला आणि सकाळी अंत्ययात्रा निघाली. मैत्र आणि त्यांच्या मित्रांचा पुरावा योग्य मानला गेला. कुंवर (वादी) च्या डोळ्यांचा रंग जो विमा पॉलिसीच्या कागदपत्रात (वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, इ.) नमूद होता तसाच होता. हातांवर फोडांचे व्रण होते. पायांवर मात्र तसे दिसले नाहीत. एका डॉक्टर ची साक्ष अशी होती अशा फोडांचा योग्य आणि नीट इलाज झाला नाही,तर सिफलिस चा रुग्ण तीन महिन्यांपेक्षा अधिक काल जगू शकत नाही. परंतु त्याला अपवाद असू शकतात. वादीचे म्हणणे असे होते की तो जेव्हा संन्याशांसोबत राहत होता तेव्हा त्याचा कुठलाच वैद्यकीय इलाज झाला नाही. असो. वादी हाच कुंवर रामेंद्र आहे हे तो सिद्ध करू शकला. बिभाबतीचा ताब्याबाबतचा मुद्दा ही फेटाळण्यात आला. तसेच दावा योग्य मुदतीत दाखल न केल्याचा मुद्दाही फेटाळण्यात आला. अशाप्रकारे एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याची मालमत्ता लाटण्याचा त्याच्या पत्नीचा प्रयत्न फसला.

संस्कृती आणि परंपरांचे गोडवे गाणाऱ्या आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा करणाऱ्या महिलांच्या देशात शंभर वर्षांपूर्वी अशी घटना घडावी याचे आश्चर्य वाटते. बिभाबतीने आपल्या पतीला का ओळखले नसावे? आपला पती जिवंत आहे या गोष्टीचा आनंद बिभाबतीला का झाला नसावा? तो मेलेलाच आहे हे सिद्ध करण्यासाठी ती तब्बल सोळा वर्षे का भांडली असावी? पतीपेक्षाही मालमत्ता महत्त्वाची का ठरावी? सारेच अनाकलनीय. पण.......ऐसा भी होता है.........

अ‍ॅड. अतुल सोनक

९८६०१११३००                                          

No comments:

Post a Comment