Wednesday, August 27, 2014

बुद्धी घ्या बुद्धी

बुद्धी घ्या बुद्धी

माझ्या तमाम भक्तांनो,

दरवर्षी पुन्हा यंदाही मी तुमच्याकडे येतो आहे. तुम्ही सर्व माझी मनोभावे भक्ती करता याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मी जमेल तसं, जमेल तेव्हा तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच. पण गेली काही वर्षे मी येताना, आल्यावर आणि जाताना माझ्या नावावर तुम्ही जे काही प्रकार करता ते नाही केले तर नाही का चालणार? तुम्ही काय काय करता आणि मला ते का आवडत नाही हे तुम्हाला सांगावं, म्हणून हा पत्रप्रपंच........

१.     मला आणताना वाजत गाजतच आणायची काही गरज आहे का? कर्णकर्कश आवाजात ढोल, ताशे, संदल, नगारे आणि काय काय वाजवता, नाचता काय, अश्लील गाणे काय वाजवता, त्यावर बीभत्स नाच काय करता...........विसर्जनाच्या वेळीही तेच. हे सर्व थांबवाल तर जरा बरं होईल.
२.     सार्वजनिक गणेशोत्सव हा रस्त्यावरच करता येतो का? हा ही मला एक सारखा पडणारा प्रश्न आहे. तब्बल १५-२० दिवस रस्ता अडवून ठेवला जातो. शामियाना, कठडे, प्रदर्शन, रोषणाई, किती, किती प्रकार. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना किती गैरसोयीचे होते हे सर्व. सारखे शिव्या घालतात तुम्हाला. त्या मलाही लागतात हो.
३.     प्रत्येक गल्लीत-मोहल्ल्यात मला बसवलंच पाहिजे का? हा याचा, तो त्याचा. व्वा. जिथे माझी स्थापना करता तिथल्या परिसरातील लोकांना काय त्रास होतो म्हणून सांगू. सतत भल्यामोठ्या आवाजात भोंगे वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यात काय मजा वाटते कुणास ठाऊक? चित्रपटातील आयटेम सॉंग लावण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे माझा उत्सव काय? असली गाणी वाजवण्यापेक्षा नैतिकतेचे धडे द्या ना लोकांना. गाड्या चालवताना नियमांचे पालन करा म्हणा, रस्त्यात थुंकू नका म्हणा, खोटं बोलू नका, भ्रष्टाचार करू नका, चोऱ्या करू नका म्हणा, सांगा जरा........काय “चिकनी चमेली” लावता?
४.     पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात नाटकं व्हायची, व्याख्यानं व्हायची, बौद्धिक मेजवानी रहायची. आजकाल? बुद्धीच्या देवतेला वंदन करताना निर्बुद्धतेचे दर्शन कशाला? चौकाचौकात नाचून रस्ते अडवण्यापेक्षा आणि रस्त्यावर फटाके फोडण्यापेक्षा त्या पैशातून गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणावर खर्च करा.
५.     चाळीस फूट, पन्नास फूट उंच मूर्ती बसवली म्हणजे मी जास्त प्रसन्न होईन असं वाटतं की काय तुम्हाला? कशाला पाहिजे एवढी अवाढव्य मूर्ती? किती खर्च होतो त्या मूर्तीवर, नेण्या-आणण्यावर-शिरवण्यावर, लाखो रुपयांची रोषणाई करता, कशाला? काय गरज आहे? रोषणाईशिवाय लोक माझ्या दर्शनाला येणार नाहीत काय?
६.     वर्गणी गोळा करताना इतकेच पाहिजे आणि तितकेच पाहिजे असा हट्ट का? ज्याला जेवढे द्यायचे आहेत स्वखुशीने आणि मर्जीने तेवढे घ्या ना, खंडणीसारखे काय मागता? आणि गैरप्रकार, भ्रष्टाचार करणाऱ्या आणि अवैध मार्गाने पैसे गोळा करणाऱ्या लोकांचे पैसे गणेशोत्सवासाठी वापरत जाऊ नका. पटलं का?

“बुद्धी दे गणराया” म्हणून मला साकडं घालता न नेहमी, घ्या बुद्धी आणि जरा सार्वजनिक नैतिकतेनं वागा. साधेपणानं गणेशोत्सव साजरा करा. आपल्या कुठल्याही कृतीचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. रस्ता अडवला म्हणून लोकांना न्यायालयात जायला लावू नका. मुलामुलीच्या परीक्षा असतात, अभ्यास करायचा असतो, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येईल असे कुठलंही कृत्य करू नका. लोकांच्या बुद्धीला चालना मिळेल, चार चांगली कामं करण्याची बुद्धी मिळेल अस्म काही तरी करा यंदाच्या गणेशोत्सवात आणि  “प्लीज डू नॉट डिस्टर्ब अदर्स बाय युवर न्यूसन्स”

तुम्हाला हवाहवासा वाटणारा तुम्हा सर्वांचा आवडता,


गणपती      

No comments:

Post a Comment