Sunday, December 1, 2013

घटस्फोटितांच्या मुलांचे प्रश्न...

घटस्फोटितांच्या मुलांचे प्रश्न....




कसल्याही कारणास्तव नवराबायकोचे पटले नाही आणि सामंजस्याने किंवा अन्य प्रकाराने (कायद्याने नमूद केलेल्या कारणांसाठी) न्यायालयातून झालेल्या घटस्फोटांमुळे कशी परवड होते, अनेक प्रकारे लिहिल्या-बोलल्या गेले आहे. न्यायालये याबाबतीत कसा वेगळा वेगळा विचार करतात हे पाहण्यासाठी बंगलोरच्या एका प्रकरणाची कहाणी आणि त्यातून निघालेला निष्कर्ष तपासणे (विवाह-विच्छेदाकडे झुकलेल्या विवाहितांसाठी) उद्बोधक ठरेल.......

चेतना रामतीर्थ आणि कुमार जाहगिरदार या विवाहित जोडप्याने लग्नानंतर (1986-1998) आपापसात पटत नसल्यामुळे बारा वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर 17.04.1999 रोजी बंगलोरच्या कुटुंब न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यांचा घटस्फोट झाला.  त्यावेळी त्यांना "आरुणी' नावाची एक नऊ वर्षांची मुलगी होती. घटस्फोटाच्या हुकूमानाम्यानुसार  आरुणीचे संयुक्त पालकत्व दोघांकडेही राहणार होते.

आरुणीचा ताबा काही दिवस चेतनाकडे आणि काही दिवस कुमारकडे राहणार होता. एक आठवडा इकडे तर एक आठवडा तिकडे असे ठरले. घटस्फोटानंतर दि.1.07.1999 रोजी चेतनाने प्रसिद्ध क्रिकेटपटू अनिल कुंबळे याचेशी पुनर्विवाह केला. त्यानंतर आरुणीला कुमारकडे ठेवून चेतना अनिल बरोबर प्रदेश दौऱ्यावर गेली. महिन्यानंतर परत आल्यावर तिने आरुणीचा कायमचा ताबा मिळावा म्हणून दि.12.08.1999 रोजी बंगलोरच्या कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला.

दोन्ही बाजूंकडील साक्षीपुरावे झाल्यानंतर कुटुंब न्यायालयाने चेतनाचा अर्ज (दि.20.04.2002 रोजी) फेटाळला आणि आरुणीचा ताबा कायमचा कुमारकडे दिला. चेतनाला दर रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भेटायची आणि महिन्यातून दोन रविवारी आरुणीला रात्रभर तिच्याजवळ ठेवण्याची (कुमारला पूर्व सूचना देवून) परवानगी देण्यात आली. कारण.............चेतनाचा पुनर्विवाह एका सुप्रसिद्ध क्रिकेटपटूशी झालेला आहे आणि ती वेगळ्याच पद्धतीने जीवन जगत आहे आणि वारंवार त्यांचे क्रिकेटच्या निमित्ताने  परदेश दौरे होत आहेत. त्यामुळे आरुणीला तिच्या वडीलांबद्दल (कुमार) अंतर निर्माण होईल, नावड आणि तिरस्कार निर्माण होईल, .

या निकालाविरुद्ध चेतना उच्च न्यायालयात गेली. बंगलोर उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय फिरवला. काही विशिष्ट कारणे आणि परिस्थिती असल्याशिवाय आईजवळील मुलीचा ताबा काढून घेता येणार नाही असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मुलीला आईपासून दूर करणे मुलीच्या दृष्टीने अपायकारक आणि नुकसानकारक होईल.सबब आरुणीचा ताबा कायमच चेतनाकडे देण्याचे आणि कुमारला तिला भेटू देण्याचे आणि  दर शनिवारी किंवा रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोबत ठेवण्याचे तसेच तिच्या शाळेच्या सुट्ट्यांमधे अर्धे दिवस आरुणीसोबत राहण्याचे आणि भेटण्याचे दिवस आणि वेळा उभयतांनी आपसात ठरवून कमी जास्त करण्याचे, बदलवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

उच्च न्यायालयाचा हा निकाल दि. 27.01.2003 रोजी आला. कुटुंब न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे साहजिकच कुमार नाराज झाला आणि त्याने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध विशेष अनुमती याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयात प्रकरण सुरू असताना चेतनाने कुटुंब न्यायालयात तसेच उच्च न्यायालयात अनेकदा आरुणीला परदेशात नेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तसेच तिचा अंतरिम ताबा मिळावा म्हणून अर्ज केले होते तेव्हाही प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. त्यावेळी सदर प्रकरण चार महिन्यांच्या कालावधीत अंतिम निकाली काढावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यावेळी ताब्याबाबतही काही निर्देश दिले होते. कुटुंब न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अनेकदा उच्च न्यायालय आणि कुटुंब न्यायालयात निरनिराळे अर्ज दोन्ही पक्षांकडून दाखल होत असत, त्यावर निर्णय होत असत. अर्ज, फेर अर्ज, अपील, आदेशावर दुरुस्तीसाठी अर्ज असे प्रकार सतत सुरू होते. त्यामुळे आरुणीचा चक्क फुटबॉल झाला होता.

कुटुंब न्यायालयाने अंतिम निकाल देताना कुमार हा शेअर दलाल असल्यामुळे आणि त्याने पुनर्विवाह केलेला नसल्यामुळे तो आरुणीला सांभाळण्यास सक्षम आहे तसेच चेतनाने एका सुप्रसिद्ध क्रिकेटपटूशी पुनर्विवाह केलेला असल्यामुळे ती वारंवार त्याचेबरोबर देशभर तसेच देशाबाहेर फिरत असल्यामुळे आरुणीची योग्य काळजी घेण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढला होता. तसेच आरुणी तिच्या वडीलांबरोबर (कुमार) राहत असताना मजेत होती आणि सुखात तसेच समाधानात होती असा निष्कर्ष नोंदवला होता.

उच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना न्यायमूर्तींनी आरुणीची दोन वेळा मुलाखत घेतली. दोन्ही वेळा तिने आपल्या मूळ आईवडीलांविषयी किंवा नवीन वडीलांविषयी(अनिल कुंबळे) कसलीही तक्रार केली नाही. उच्च न्यायालयाने काही विशिष्ट कारणे असल्याशिवाय आईजवळून मुलाला किंवा मुलीला वेगळे करणे चूकच आहे असे मत व्यक्त केले होते त्यावर सर्वोच्च न्यायालयात कुमारच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे असे होते की योग्य आणि सयुक्तिक कारणे देवून दिल्या गेलेला कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने उगीचच फिरवला होता. ते पुढे असेही म्हणाले की चेतनाने कुंबळेशी लग्न केल्यामुळे त्याचे ख्यातनाम व्यक्ती असणे, वारंवार सुरू असणारे दौरे, मुलाखती, सार्वजनिक कार्यक्रम, याचा वेगळाच प्रभाव आरुणीवर पडू शकतो. कुमार पासून दूर राहण्यासाठीही आरुणीला समजावल्या जावू शकते. याउलट कुमार ने पुनर्विवाह केलेला नाही. मुलीचे योग्य पालन पोषण आणि संगोपन हेच एकमेव उद्दिष्ट त्याच्या आयुष्यात राहिले होते. पैशांचीही कमतरता नाही सबब कुटुंब न्यायालयाचा निर्णय योग्यच होता आणि तोच कायम ठेवण्यात यावा अशी मागणी कुमारच्या वकिलांनी केली.

चेतनाच्या वकिलांनी कुमारच्या वकिलांचे म्हणणे खोडून काढले. त्यांच्या मते चेतना आणि अनिल यांच्या प्रकरण प्रलंबित असतानाच्या वागणुकीवरून कुठेही असे दिसत नाही की त्यांनी आरुणीचे मत कुमार च्या प्रती कलुषित केले. दोघेही तिला चांगलेच सांभाळतील अशी त्यांनी हमी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एस.व्ही. पाटील आणि न्या. डी.एम. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने दि.29.01.2004 रोजी या प्रकरणात निकाल दिला. मुलामुलीचा ताबा आईकडेच (काही विशिष्ट कारणे नसली तर) असला पाहिजे हे उच्च न्यायालयाचे ढोबळ आणि सरसकट मत अमान्य करीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल मात्र आईच्या म्हणजे चेतानाच्याच बाजूने दिला, कुमारची अपील फेटाळली आणि त्याची कारणे अशी दिली..............
. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आरुणीला तिची आईच उत्तमरीत्या सांभाळू शकते या वयात तिला आईचीच अधिक गरज असते. चेतना ने पूर्वीची नोकरी सोडून दिलेली असून ती घरीच राहून मुलीचे संगोपन योग्य आणि उत्तम रित्या करू शकते.
. चेतनाला अनिलपासून मूल होणार असून तेही आरुणीसाठी तिच्याकडे राहण्यासाठी चांगले कारण आहे.
. कुमार हा त्याचे वडीलांबरोबर एकटाच राहत असून त्यांचेघरी एकही महिला सदस्य नाही. सबब आरुणीसारख्या मुलीचे योग्य संगोपन अशा घरात होवू शकणार नाही.
.कुमार हा एक व्यस्त शेअर दलाल असून घर बसल्या व्यवसाय करू शकत असला तरी त्याला कामाच्या संदर्भात बाहेर जावे लागू शकते.
. त्याच्याबद्दल आरुणीचे मत कलुषित केले जाईल तिला त्याचा तिरस्कार करण्याबद्दल उद्युक्त केले जाईल या कुमारच्या मताला आधार असा कुठाली पुरावा आलेला नही. उलट अनिल कुंबळेने त्याच्या साक्षीत विभक्त झालेल्या चेतना-कुमार आणि आरुणीबद्दल सहकार्याची आणि मानवीय भावनाच व्यक्त केलेली दिसते. तसेच त्याच्यातर्फे आरुणी आणि कुमार मध्ये वितुष्ट किंवा तिरस्काराची भावना निर्माण होईल अशी कुठलीही कृती करणार नसल्याचेही म्हटले होते.
. उच्च न्यायालयाने कुमारला आरुणीला वेळोवेळी भेटण्याचा दिलेला हक्क आणि त्याच्या वेळा यात कुठलाही बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही.
. चेतना जेव्हा जेव्हा अनिलबरोबर क्रिकेट दौऱ्यावर परदेशात जाईल तेव्हा आरुणीला दुसऱ्या कोणाकडे ठेवता कुमार कडेच ठेवावे.
अशा प्रकारे आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवतो. आम्हाला आशा आहे प्रकरणातील दोन्ही पक्ष समंजस, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि पुरोगामी विचाराचे असल्यामुळे आजपर्यंत जसे सद्भिरुचीपूर्ण वागले तसेच यापुढेही वागतील आणि त्यांच्यात संबंधही चांगले राहतील तसेच कुठलीही कटुता निर्माण होणार नाही आणि आरुणीचे हित हेच सर्वोपरी राहील.”

या पद्धतीने प्रकरणाचा अंतिम निकाल लागला. नशीब, दोन्ही बाजू बऱ्यापैकी समंजस असल्यामुळे निकाल लवकर लागला नाही तर मुलगी लग्नाच्या वयाची होईपर्यंत न्यायालयीन लढाईच सुरू राहिली असती. असो. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जे आई-वडील मुलामुलीच्या ताब्यासाठी भांडत असतील त्यांच्या मनाला किती यातना होत असतील आणि ज्या तान्हुल्यासाठी किंवा तान्हुलीसाठी हे सुरू असेल त्यांच्या बालमनावर काय परिणाम होता असतील? निर्णय कधी इकडे आणि कधी तिकडे होत असतील तर त्या कोमल आणि निरागस  जीवाचे किती हाल?

अतुल सोनक
९८६०१११३००



No comments:

Post a Comment