Saturday, November 9, 2013

स्त्रीधनावर डल्ला...नको रे बाबा !!!!!


स्त्रीधनावर डल्ला...नको रे बाबा !!!!!

लुधियाना येथील प्रतिभा राणी या महिलेने तिचे पती सूरज कुमार, त्यांचे वडील, तीन भाऊ आणि एक जावई यांचेविरुद्ध लुधियाना येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात एक तक्रार दाखल केली. त्या तक्रारीचे थोडक्यात स्वरूप खालीलप्रमाणे...
१)       प्रतिभा राणीचे लग्न सूरज कुमार यांच्याशी दि.४.०२.१९७२ रोजी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडले. २) लग्नाचे वेळी सूरज कुमारचे वडील, तीन भाऊ आणि जावई यांनी प्रतिभाच्या कुटुंबीयांना हुंड्याची मागणी केली. ३) दि.५.०२.१९७२ रोजी प्रतिभाची "डोली" उठण्याचे वेळी/ बिदाईचे वेळी तक्रारीसोबत जोडलेल्या यादीप्रमाणे सोन्याचे दागिने, काही इतर मौल्यवान वस्तू, कपडे,इ (अंदाजे ६०००० रुपये किंमतीच्या) त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या. ४) लग्न होवून प्रतिभा सासरी आल्यापासून हे सर्व जण तिला चिडवणे, त्रास देणे, मारणे, उपाशी ठेवणे असले प्रकार करीत होते. हे सर्व प्रतिभाने माहेराहून अजून पैसे आणावे म्हणून केले जात होते. ५) १९७७ सालाच्या सुरुवातीला प्रतिभाला तिच्या मुलांसह घरातून हाकलून देण्यात आले. ६) पंचायत सदस्यांच्या मध्यस्थीनंतर दि.२१.०६.१९७७ रोजी सूरज कुमार प्रतिभाच्या घरी आला आणि तिला आणि मुलांना त्रास न देण्याबाबत आणि तिचेशी गैरवर्तन न करण्याबाबत लेखी हमीपत्र देवून तिला आणि मुलांना त्याचे घरी घेवून गेला. ७) त्यानंतर पुन्हा सर्वांनी तिला त्रास देणे आणि गैरवर्तणूक करणे सुरू केले आणि दि.११.१२.१९८० रोजी पहाटे ४.३० वाजता तिला कैलाश थिएटर चौकात आणून सोडून दिले. ८) यादीत नमूद केलेल्या वस्तू (स्त्रीधन) सूरजच्या घरच्यांनी प्रतिभाला परत दिल्या नाही. ९) रोजी प्रतिभाने टाकलेल्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अन्वये केलेल्या अर्जाचे (पोटगी मिळण्यासाठी) सुनावणी साठी हजर असताना( दि.१०.०२.१९८१) सूरज कुमार आणि त्याच्या भावाला प्रतिभाच्या आईवडीलांनी तिच्या सर्व वस्तू (स्त्रीधन) परत करण्याची विनंती केली असता त्यांनी साफ नकार दिला. १०) दि.१७.१२.१९८१ रोजी प्रतिभाने सूरज कुमार ला नोटीस पाठवून स्त्रीधन परत करण्याची मागणी केली. ती नोटीस मिळूनही त्याने स्त्रीधन परत केले नाही. ११) अशा प्रकारे लग्नाचे वेळी प्रतिभाला वापरण्यासाठी आणि फक्त तिच्याच उपयोगासाठी देण्यात आलेले परंतु सासरच्यांकडे विश्वासाने  सोपवण्यात आलेले स्त्रीधन तिला वापरण्यासाठी न देता स्वत: अप्रामाणिक हेतूने वापरून स्वत:चा फायदा करून घेतला आणि प्रतिभाचे नुकसान केले म्हणून सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून भा.दं.वि.च्या कलम ४०५ आणि ४०६ अन्वये गुन्हा केला आहे.
प्रतिभाची ही तक्रार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल झाली आणि न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना समन्स बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या आदेशाला  सूरज कुमार आणि इतरांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाच्या निर्णयाचा हवाला देत आणि स्त्रीधन हे स्त्री लग्न होवून सासरी आली की पती-पत्नीची सामायिक मालमत्ता होते असे कारण देत सूरज कुमार आणि इतरांची आव्हान याचिका मंजूर केली आणि प्रतिभाच्या तक्रारीवर सुरू करण्यात आलेले प्रकरण खारीज केले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रतिभाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दि.१२.०३.१९८५ रोजी तिचे अपील मंजूर केले. उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. एवेढेच नव्हे तर ज्या पूर्ण खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारे तो निर्णय देण्यात आला होता तो निर्णय ही रद्दबातल ठरवला. लग्नाचे वेळी कुठल्याही स्त्रीला ज्या काही भेटवस्तू (कसल्याही स्वरूपात) दिल्या जातात त्यावर तिचा आणि फक्त तिचाच हक्क असतो ती लग्न करून सासरी आली म्हणून सासरच्यांचा त्या वस्तूंवर (स्त्रीधनावर) इतर कुणाचाही अगदी पतीचा सुद्धा हक्क नसतो. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अधोरेखित केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फाजल अली, न्या.सव्यसाची मुखर्जी आणि न्या. ए. वरदराजन यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने २ विरुद्ध १ अशा बहुमताने प्रतिभाची अपील मंजूर केली. न्या. अली आणि न्या. मुखर्जी अपील मंजूर करण्याच्या मताचे होते तर न्या. वरदराजन अपील फेटाळण्य़ाच्या मताचे होते. न्या. अली आणि न्या. मुखर्जी यांचे मत असे होते......
   Crimes committed in matrimonial home are as much punishable as anywhere else. The mere factum of the husband and wife living together does not entitle either of them to commit a breach of criminal law and if one does then he/she will be liable for all the consequences of such breach. In the case of stridhan property also, the title of which always remains with the wife though possession of the same may sometimes be with the husband or other members of his family, if the husband or any other member of his family commits such an offence, they will be liable to punishment for the offence of criminal breach of trust under sections 405 and 406 IPC. Just as a newly married woman living in the same house and under the same roof cannot be expected to keep her personal property or belongings like jewellery, clothing, etc. under her own lock and key thus showing a spirit of distrust to the husband at the very behest, a husband cannot be permitted to cast his covetous eyes on the absolute and personal property of his wife merely because it is kept in his custody, thereby reducing the custody to a legal farce. On the other hand, even if the personal property of the wife is jointly kept it would be deemed to be expressly or impliedly kept in the custody of the husband and if he dishonestly misappropriates or refuses to return the same, he is certainly guilty of criminal breach of trust, and there can be no escape from this legal consequence.

तर न्या. वरदराजन म्हणतात.........सदर स्त्रीधन पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडे विश्वासपूर्वक सुपूर्द केल्याचा किंवा ठेवायला दिल्याचा करारनामा असल्याशिवाय अशाप्रकारे विश्वासघात झाल्याची फौजदारी कारवाई करता येणार नाही………..
In these circumstances, I think that in the absence of a separate agreement and specific entrustment by the wife to the husband and of his relations and vice versa of the property of the husband to the wife and or her relation, it would not be possible to draw an inference of entrustment of custody or dominion over the property of one spouse to the other and his or her relations so as to attract the stringent provisions of s.406 I.P.C. The offense of criminal breach of trust is cognizable and non-bailable and punishable with imprisonment for a term of three years or with fine or with both. In the absence of such a separate agreement for specific entrustment of the property of either spouse the appropriate remedy would appear to be by way of a civil suit where there is scope for the parties to the marriage coming together at the instance of relations, elders and well-wishers and patching up their differences. Entertaining complaints of the irate wife or husband against the husband or wife without even an allegation of a specific and separate agreement constituting entrustment of the property of the wife or the husband would have disastrous effects and consequences on the peace and harmony which ought to prevail in matrimonial homes.

असे मत व्यक्त करून न्या. वरदराजन यांनी प्रतिभाची अपील फेटाळली.
मनुस्मृतीला नावे ठेवणाऱ्यांनी, मनुस्मृती जाळणाऱ्यांनी विशेष लक्ष देवून वाचावा असा हा निर्णय आहे. (मनुस्मृती हा अत्यंत टाकावू ग्रंथ आहे असे समजणाऱ्या महाभागांनी सर्वोच्च न्यायालयही मनुस्मृती विचारात घेत असते हे लक्षात घ्यावे.) या निर्णयात "स्त्रीधन " या शब्दाची व्याख्या मनुस्मृतीतूनच घेण्यात आली आहे. स्त्रीधनावर फक्त तिचाच हक्क आहे आणि दुष्काळ, आजारपण, अत्यंत हलाखीची परिस्थिती या किंवा तत्सम आत्यंतिक गरजेपोटी पती स्त्रीधन वापरू शकतो परंतु परिस्थिती सुधारल्यावर स्त्रीधन किंवा त्याचा मोबदला परत करण्याची त्याचेवर नैतिक जबाबदारी असते. सोन्याचे दागिने, साड्या, ब्लाऊज, गाऊन, नाईट ड्रेस हे सर्व प्रतिभाच्याच कामाचे होते आणि त्यावर पतीची सामायिक मालकी (उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे) असण्याचे काही कारण नाही. वारंवार मागणी करूनही सूरज कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांनी ते सर्व "स्त्रीधन" प्रतिभाला परत न केल्यामुळे त्यांनी तिचा फौजदारी स्वरुपाचा विश्वासघात केला आहे असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे,  असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. उच्च न्यायालयाच्या मते स्त्रीधन परत मिळवण्यासाठी पत्नी पतीविरुद्ध दिवाणी दावा दाखल करू शकत असल्यामुळे तिला फौजदारी तक्रार करण्याचा अधिकार नाही. हे मत सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरवले.

शेवटी स्त्रीधनासाठी प्रतिभाला सर्वोच्च न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले आणि तिला न्याय मिळाला. म्हणजे तिच्या तक्रारीची दखल घ्यायला खालच्या न्यायालयाला भाग पडले. नंतर गुन्हा सिद्ध झाला असेल, नसेल तो भाग अलाहिदा परंतु एक साधी तक्रार दाखल करायला एका स्त्रीला किती त्रास झाला हे या निकालावरून कळते. खालच्या न्यायालयात तिच्या तक्रारीची दखल घेतल्या गेली, उच्च न्यायालयात तिच्या विरुद्ध निकाल गेला, सर्वोच्च न्यायालयात बहुमताने का होईना तिला यश मिळाले. तिच्यात जिद्द होती, तिला तिच्या आईवडीलांनी पैसा पुरवला असणार, म्हणूनच ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावू शकली. अशा किती तरी प्रतिभा खालच्या न्यायालयातच दम तोडतात (म्हणजे हरून जातात आणि शारीरिक, मानसिक, आर्थिक कमजोरी मुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे वरच्या न्यायालयात दाद मागू शकत नाहीत.). त्यांची जिथे मजल जाते, जावू शकते तिथपर्यंत जावून जे मिळते त्यालाच "न्याय" समजून अशा अनेक प्रतिभा निष्प्रभ होतात.

अ‍ॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००




No comments:

Post a Comment